Рет қаралды 3,695
नयनरम्य तिलारी धरण। Tillari Dam |
बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेलही की महाराष्ट्रात तिलारी नावाचे एक गाव आहे. कोल्हापुरसह सीमा भागातील लोक याला जरूर ओळखत असतील. तिलारी म्हटलं की आठवतं ते तेथील वीज प्रकल्प. पण याही पलीकडे याचं वेगळेपण म्हणजे लागणारा पाऊस आणि झोंबणारा वारा. सह्याद्रीची कडेकपारी, हिरविगार वनराई, क्षणाक्षणात बदलणारी धुक्यांची गर्दी, दगड कपारीतून खळखळणारा आवाज तर तुषार उडविणारे धबधबे यामुळे काही क्षणांसाठी आपण या भूतलावर नसून वेगळ्या दुनियेत असल्याचा भास निर्माण होतो. ध्यास निर्माण करणारी दुनिया म्हणजे तिलारी. पावसाळ्यातली सहल म्हटली की आपणाला आठवतो तो कोकण, कोकणातील पाऊस आणि यातीलच एक तिलारी नगर (तिलारी). येथील हिरवागार निसर्ग, गर्द झाडी, दऱ्या खोऱ्यातील विहंगम दृश्य, ऊन पावसाचा खेळ, कोसळणारे धबधबे आणि मनाला भावणारा गारगार वारा यामुळे मन अगदी चिंब चिंब होऊन जातं.
या धावपळीच्या जीवनात वर्षाचे बाराही महिने आपण फक्त पावसाळ्यातील सहली आखण्याचे काम करत असतो. चारचार दिवसाची सुट्टी काढून फिरणे आपल्याला जमत नाही म्हणून आपण एक, दोन दिवसाच्या सहलीचा प्लॅन आखतो. माहितीतल्या ठिकाणापेक्षा नवीन ठिकाणी जाऊन मौज करण्याची बातच न्यारी असते. पण असे करताना तुरळकच लोक दिसतात. आपण शोधक आणि रोचक वृत्तीतून पाहिले तर आपल्या आजुबाजुला अनेक स्थळे पाहण्यासारखी असतात. पण आपणाला ती माहीत नसतात. असेच तिलारीच्या बाबतीत आहे. असो. पण आम्ही कोल्हापूरकर म्हणा किंवा चंदगडकर या बाबतीत फार सुदैवी आहोत. कारण वैविध्याने नटलेली पश्चिम घाटातील अनेक ठिकाणे आम्हाला माहिती आहेत. त्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगा, घनदाट जंगल, दऱ्या खोऱ्यांनी विस्तारलेला परिसर, नद्या-नाले आणि खळखळून वाहणारे धबधबे यामुळे वर्षा पर्यटनासाठी पन्हाळा, शाहूवाडी, आंबाघाट, गगनबावडा, आजार, आंबोली आणि चंदगड ही ठिकाणे जवळची वाटतात.
चंदगड तालुक्यातील तिलारीसह संपूर्ण तालुक्याचे वातावरण हे अतिशय चांगले असून हवापालटासाठी अत्यंत लाभदायक आहे. चांगले वातावरण, बोचणारा गार वारा यामुळे याला प्रति महाबळेश्वर असेही म्हणतात. कारण भर पावसातही येथे मोठ्या प्रमाणावर थंडी, जोरदार पाऊस, कोसळणारे अनेक धबधबे, घनदाट जंगल, हिरविगार वनराई आणि विविध जीवसृष्टीमुळे आपण महाबळेश्वरमध्ये असल्याचा भास होतो. काही प्रमाणात सुविधांचा अभाव असल्यामुळे हा भाग लोकांच्या दृष्टीपासून अलिप्त होता. पण साहसी पर्यटक आणि वेगळ्या ठिकाणी जाऊन आनंद घेण्यासाठी धडपडणाऱ्या अनेकांच्यामुळे आज तिलारीसह चंदगडही लोकांच्या समोर येत आहे.
स्वर्गीय सुख जर अनुभवायचे असेल तर थोडे कष्ट घेऊन तिलारीला जायलाच हवे. येथील निसर्ग सौंदर्य हे मनात भरणारे असून आपण आनंदवनात असल्याचा भास होतो. येथील प्रवास व भ्रमंतीही अवर्णीय असते. स्वर्गीय सुखाचा बोध हा येथे घेता येतो. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका व याचे शेवटचे टोक तिलारी. गोवा, कर्नाटक, सिंधुदुर्ग या राज्यांना जोडणारा सीमावर्ती भाग. पश्चिमेकडे वाहणारी व सह्याद्रीच्या घाट माथ्यावर उगम पावणारी तिलारी नदीमुळेच या भागाला तिलारी म्हणून ओळखलं जात. पण तिलारी गाव मात्र आहे कोकणात घाटमाथ्याच्या खाली.
पश्चिम घाट म्हटले की घनदाट जंगल, दऱ्याखोऱ्यांचे व समृद्ध जैवविविधतेने नटलेला. यामुळे येथील लोक वस्ती ही विरळच, वाड्या वस्त्या, गावेही दूरवर. यामुळे हा परिसर मुख्य भूमीपासून किंवा समाजपासून विभक्त राहिला आहे. पण साहसी पर्यटनासाठी हा भाग म्हणजे एक पर्वणीच आहे. येथील घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, धरण, स्वप्नवेल पॉईंट ही येथील खासियत आहे.
काय पाहाल
वन्यजीव तिलारी हा परिसर अतिशय घनदाट जंगलाचा व पाणी असलेला भाग असल्याने येथे पट्टेरी वाघ, हत्ती (कर्नाटकातून स्थलांतरित झालेले), घाट माथ्यावर दिसणारा बिबट्या, गवा ( सकाळी ८ ते सायंकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान जंगलाच्या कोणत्याही वळणावर अथवा पाणवट्यावर दिसतो.), मोर- लांडोर, नीलगाय, सांबर, रानकुत्री, कोल्हे, भेकर, हरीण, साळींदर हे प्राणी दिसतात. त्याचबरोबर मोठे जंगल असल्याने अनेक जातीचे दुर्मिळ पक्षीही पाहता येतात.
तिलारी धरण पश्चिम घाट माथ्यावरचे व पश्चिम दिशेला वाहत जाणाऱ्या आणि पुढे गोवा मार्गे अरबी समुद्राला मिळणाऱ्या तिलारी नदीवर महाराष्ट्र शासनाने बनविलेले धारण म्हणजे तिलारी. हे ६५० मीटर उंचीवर असून दाट जंगलातील वीज निर्मिती प्रकल्प आहे. धामणे या गावात ३८.५ मीटर उंचीवर दगडी धारण आहे तर याच्या जलाशयाचा विस्तार हा तुडये, हाजगोळी गावापर्यंत आहे. या धरणाच्या पाण्याचा वापर करून कोदाळी गावाच्या जवळील घाटात भूगर्भात वीजनिर्मिती केली जाते. पूर्वी हे सहज पाहता येत होते पण आता यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते.
स्वप्नवेल पॉईंट स्वप्नवेल पॉईंट म्हणजे पावसाळ्यात तीनशे फुटांवरून खोल दरीत कोसळणाऱ्या अनेक धबधब्यांचे ठिकाण. अनेक धबधबे येथे कोसळत असल्याने संपूर्ण भाग हा धुक्याने झाकला जातो. तिलारी येथे जाऊन सहज पाहता येणारे हे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्वत्र धुके, अधून मधून धुक्याची सरकत जाणारी दुलई आणि त्यातून दिसणारी वाहती तिलारी नदी, खोलवर, दूरवर पसरलेले नदीचे खोरे पाहून डोळे मिटुच नये, सर्व सामावून घ्यावं असं वाटणार आणि हवा हवासा वाटणारा हा परिसर. येथील हिरवागार निसर्ग, टोचणारा बोचणारा वारा आणि पाऊस यामुळे आपल्याला वेगळाच अनुभव फक्त स्वप्नवेल पॉईंटवर अनुभवायला मिळतो.
ग्रीन व्हॅली रीसॉर्ट महाराष्ट्र वनखात्याने खासगी सहकार्यातून कोदाळीजवळ ग्रीन व्हॅली रीसॉर्ट सुरू केला आहे. इको-टुरिझमला प्राधान्य देऊन तिलारी परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे. स्थानिक लोकांचे सहकार्यही घेण्यात आले असून रीसॉर्टमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे कुटुंबासमवेत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो. ग्रीन व्हॅलीतून रातोबा पॉइंट, तिलारी नदी, माऊली मंदिर, लष्कर सर्च पॉइंट,आदींचा अनुभव घेता येतो.