Рет қаралды 11,254
प्रतिनिधी बोरगाव
सुरगाणा तालुक्यातील हिरीडपाडा येथे सालाबादप्रमाणे गौराई मिरवणूकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणूक काढण्यात आली होती.
आखाती सणाच्या ७ दिवस अगोदर लहान टोपली (दुरडी) मध्ये व माती घेऊन त्यात पाच प्रकारचे धान्य पेरले जाते. यात भात, नागली, मका, तूर, उडीद आदी धान्यांचा समावेश केला जातो. धान्य पेरलेल्या टोपलीला गौराई असे म्हटले जाते. पेरलेल्या धान्याला पाणी शिंपडतात या गौराईला सुर्यप्रकाश व हवा न लागो म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठी टोपली झिल्याखाली झाकून ठेवतात, म्हणजे रोप हिरवी न होता पिवळ्या रंगाची होतात. पुढील सात दिवस गौराईला सकाळ संध्याकाळ पाणी घातले जाते. या दरम्यान रात्रीच्या वेळी महिला गौराईची गाणी म्हणतात. गौराईला गावाजवळील नदी, तलाव, किंवा विहिरीवर नेतात तिथे पूजा करुन उगवलेली गौराई तोडून घेतात व खालील माती- मुळांचा भाग पाण्यात विसर्जन करतात. तोडलेली गौराई थोडीशी देवाला अर्पण करून बाकी उरलेली महिला आपल्या केसात माळतात. आखाती सणाला नवविवाहित मुली सासरहून माहेरी येत असतात. हा सण शेवटचा असल्यामुळे या सणाला बूडीत सण असेही म्हणतात.
या पेरलेल्या धान्यापासून उगवलेले रोप हे योग्य आहे की कमजोर आहे. याचे परिक्षण आदिवासी बांधव करतात म्हणजे येणाऱ्या पुढील पावसाळ्यात हे पीक शेतात कसे येणार याचा अंदाज आदिवासी शेतकरी बांधव लावत असतात. सुरगाणा तालुक्यातील हिरीडपाडा गावात तरूणी, महिला गौराईची गाणी म्हणत संबळ वाद्यावर गौराईची मिरवणूक काढत सण साजरा करण्यात आला.