Рет қаралды 16,937
🪷Shree swami samarth🪷
Shreemad Bhagwat Geeta !
श्रीभगवान म्हणाले, हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना),जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. ॥
अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. ॥ १८-६३ ॥
सर्व गोपनीयांहून अतिगोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे. ॥ १८-६४ ॥
तू माझ्या ठिकाणी मन ठेव. माझा भक्त हो. माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो. कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. ॥ १८-६५ ॥
सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. ॥ १८-६६ ॥
जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतास्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो, त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. ॥ ७-२१ ॥
तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो. ॥ ७-२२ ॥
पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त, मला कसेही भजोत, अंती मलाच येऊन मिळतात. ॥ ७-२३ ॥
किंवा हे अर्जुना, हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. ॥ १०-४२ ॥
माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी. कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदिकारण आहे. ॥ १०-२ ॥
जो मला वास्तविक जन्मरहित, अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्त्वतः जाणतो, तो मनुष्यांत ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. ॥ १०-३ ॥
मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे, असे जाणून श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला नेहमी भजतात. ॥ १०-८ ॥
निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांत माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. ॥ १०-९ ॥
त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्त्वज्ञानरूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. ॥ १०-१० ॥
त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो. ॥ १०-११ ॥
कारण ही अलौकिक अर्थात अतिअद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात, ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजे संसारातून तरून जातात. ॥ ७-१४ ॥
जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. ॥ ९-२६ ॥
हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. ॥ ९-२७ ॥अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभफळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. ॥ ९-२८ ॥
मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. ॥ ९-२९ ॥
म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील. ॥ ८-७ ॥
माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, सजीवमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी, असे तत्त्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. ॥ ५-२९ ॥
हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मत्परायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. ॥ ७-३ ॥
मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. ॥ ४-६ ॥आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा-मरणारा आहे, असे समजतात. ॥ ७-२५ ॥
हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो. पण श्रद्धा, भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. ॥ ७-२६ ॥
जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. ॥ ८-५ ॥
श्रीभगवान म्हणाले,हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना),माझ्यात मन ठेव. माझा भक्त हो. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ॥ ९-३४ ॥
हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. ॥ ४-७ ॥
सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. ॥ ४-८ ॥
🪷Jai shree Krishna🪷